ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला मरणाने शून्यवत करावे, आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे. (इब्री 2:14-15)
ख्रिस्त आपल्याला मृत्यूच्या भीतीपासून बंधमुक्त करून “धन-वैभव नाहींसे हो, कीं सोडून जावोत सर्व आप्तजन, कीं नश्वर जीवनहि लयास जावो” अशा प्रीतियुक्त त्यागाच्या मानसिकतेचे जीवन जगण्यांस कसे स्वतंत्र करतो?
ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती
“मुले” हा शब्द यापूर्वीच्या वचनातून घेतलेला आहे जो मुक्तिदाता ख्रिस्ताच्या आध्यात्मिक संततीचे सूचक आहे. ही “देवाची लेकरें” देखील आहेत. दुसऱ्या शब्दांत सांगायचे झालें तर, देवानें ख्रिस्ताला पाठविले तेव्हां त्याचा मुख्य उद्देश्य आपल्या “मुलांचे” तारण करणें हाच होता. “ज्या अर्थी ‘मुले’ एकाच रक्तमांसाची होती. . . “
त्या अर्थी तोही त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला.
देवाचा पुत्र, जो देही होण्यापूर्वी सनातन शब्द म्हणून होता (योहान 1:1), तो रक्तमांसाचा झाला व त्याच्या देवपणाने मानवरूप परिधान केलें. तो पूर्ण मनुष्य बनला, त्याचवेळी पूर्णतः देव म्हणूनही कायम होता.
कीं मरणाने. . .
ख्रिस्त मानव झाला तो मरण्यासाठीं. देही होण्यापूर्वी, देव म्हणून पापी लोकांसाठीं मरणें त्याला शक्य नव्हतें. पण रक्तमांसाचा झाल्यावर, त्याला ते शक्य झालें. मरण हेच त्याचे ध्येय होते. त्यामुळें त्याला नश्वर मानव रूपांत जन्म घ्यावा लागला.
हेतू हा कीं, मरणावर सत्ता गाजवणारा म्हणजें सैतान, ह्याला…..शून्यवत करावे. . .
ख्रिस्त मेला तेव्हां त्यानें सैतानाचा पराभव केला. तो कसा? आपली सर्व पापें दूर करून (इब्री 10:12). याचा अर्थ असा कीं देवासमोर आपल्यावर दोषारोप ठेवण्यासाठीं सैतानाकडें कोणतीही कायदेशीर तर्कबुद्धी नाहीं. “देवाच्या निवडलेल्या लोकांवर दोषारोप कोण ठेवील? देवच नीतिमान ठरवणारा आहे” (रोमकरांस 8:33). तो कोणत्या आधारावर आम्हांला नीतिमान ठरवतो? येशूच्या रक्ताद्वारे (इब्री 9:14; रोमकरांस 5:9).
सैतान आपल्याविरुद्ध जें शेवटचे शस्त्र उपयोगांत आणतो तें म्हणजें आमची स्वतःची पापें. येशूच्या मृत्यूने जर ते दूर केलें गेलें आहे तर सैतानाचे मुख्य शस्त्र त्याच्या हातातून हिसकावून त्याला निशस्त्र करण्यांत आलें आहे. त्या अर्थाने, तो शून्यवत झाला आहे.
आणि जे मरणाच्या भयाने आयुष्यभर दास्याच्या बंधनात होते त्या सर्वांना मुक्त करावे.
तर मग, आता आपण मरणाच्या भयापासून मुक्त झालेंलें असें आहोत. देवानें आपल्याला नीतिमान ठरवले आहे. आपल्यासमोर आहे ती फक्त भावी कृपा. सैतान देवाचा हा विधिलेख रद्द करू शकत नाहीं. ही सार्वकालिक सुरक्षा लगेच आपल्या जीवनावर कार्यकारी व्हावी अशी देवाची इच्छा आहे. हेतू हा कीं, त्यानें वर्तमान समयी आपल्याला दास्याच्या व भीतीच्या बंधनातून मुक्त करावे व शेवट पूर्णानंदाने व्हावा.